एलबीपीएम’ महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न
सोलापूर √ जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आणि तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या विकसनशील देशाला कौशल्याधिष्ठीत शिक्षणाच्या माध्यमातून विकसित बनविणे हे नव शैक्षणिक धोरणाची फलश्रुती आहे असे प्रतिपादन माढा येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील हेळकर यांनी केले. सोलापुरातील सात रस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात शिक्षणशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने ‘नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरेश ढेरे होते यावेळी व्यासपीठावर डॉ. दत्तात्रय तापकीर, डॉ. विष्णू शिंदे, डॉ.आनंद शिंदे, प्रा.निलोफर तांबोळी यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना प्राचार्य डॉ हेळकर म्हणाले की, नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देऊन त्यांना रोजगारक्षम बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ सुरेश ढेरे म्हणाले की, या धोरणातून होणाऱ्या शैक्षणिक बदलाची अंमलबजावणी करताना येणारी आव्हाने त्यातील उणीवा या ह्या धोरणाच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेतूनच दूर करता येतील,चर्चासत्रातील विविध सत्रांत पुणे येथील शिक्षण तज्ञ डॉ. दत्तात्रय तापकीर, विजापूर येथील अक्कमहादेवी महिला विद्यापीठातील डॉ. विष्णू शिंदे, शिक्षण तज्ञ डॉ. एच. एन.जगताप यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत समन्वयक डॉ.आनंद शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ इंदुमती चोळळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.निलोफर तांबोळी यांनी केले यावेळी राज्यभरातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.