वीरशैव व्हिजनच्या बसव व्याख्यानमालेस उस्फुर्त प्रतिसाद
मेट्रो सोलापूर √ परदेशात लिपस्टिकचा वापर थंडी पासून बचाव व्हावा म्हणून केला जातो आणि आपण आपल्याकडे फॅशन म्हणून वापरतो. अंगभर कपडे न वापरता तोकडे कपडे वापरले जातात,सध्या कुटुंबातील संवाद हरवत चालला आहे. कुटुंबातील सगळे सदस्य मोबाईल मध्ये व्यस्त असतात. मोबाईलमुळे अडचणी, संकटे निर्माण होत आहेत, टीव्ही वरील कार्टून पाहून मुले विघातक कृत्ये करीत आहेत त्यामुळे पाश्चात्यांचे अंधानुकरण नको असे प्रतिपादन व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांनी केले.
सोलापूरातील वीरशैव व्हिजनच्या बसव व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी मंचावर हृदयरोग तज्ञ डॉ. शैलेश पाटील, डॉ. प्रकाश घाटोळे, डॉ. सिद्धेश्वर वाले, राजशेखर मिनजगी, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले व उत्सव समितीचे अध्यक्ष शिवानंद सावळगी उपस्थित होते.
यावेळी व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांनी ‘चला संस्कार जपू या’ या विषयावर बोलताना पुढे म्हणाले की, सध्या तरुणींवर भुरळ पाडून त्यांना फसविण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा फसव्या गोष्टींना तरुणींनी बळी पडू नये. अशावेळी माता-पित्यांनी मित्र-मैत्रिणीच्या भूमिकेत येऊन त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. तसेच प्रत्येक मुलींनी स्वसंरक्षणासाठी कराटेचे प्रशिक्षण घेतलेच पाहिजे. कोणत्याही मुलींनी आपल्या आई वडिलांच्या इच्छेविरोधात दुसऱ्या जाती-धर्मातील तरुणांशी लग्न अजिबात करू नये. त्याचबरोबर घरातील वयोवृद्धांची सेवा केलीच पाहिजे. कारण आपणही कधीतरी वयोवृद्ध होणार आहोत अशा अनेक विषयावर शेटे यांनी यावेळी प्रबोधन केले.
यावेळी बोलताना डॉ. पाटील म्हणाले की, वीरशैव व्हिजन सोलापूर शहरात सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, प्रबोधनात्मक, सांस्कृतिक, क्रीडा आणि कला क्षेत्रात अनमोल असे कार्य करत आहे अशा सामाजिक संस्थांची सध्या समाजाला गरज आहे.
प्रारंभी शिवानंद सावळगी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल बिराजदार यांनी तर आभार अमित कलशेट्टी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागेश बडदाळ, सोमेश्वर याबाजी, चिदानंद मुस्तारे, राजेश नीला, सोमनाथ चौधरी, श्रीमंत मेरू, अमोल कोटगोंडे, गंगाधर झुरळे, गौरीशंकर अतनुरे, मनोज पाटील, बसवराज चाकाई, गणेश घाळे, प्रा. मल्लिकार्जुन पाटील, अविनाश हत्तरकी, सिद्धेश्वर कोरे, बसवराज जमखंडी, चेतन लिगाडे, गौरीशंकर अतनुरे यांनी परिश्रम घेतले.