२९ ऑगस्टला ठरवू लढायचं की पडायचं – सोलापुरातील शांतता रॅली मधून मनोज जरांगे पाटील यांचे मराठ्यांना आवाहन

मेट्रो सोलापूर – सरकारला 29 ऑगस्ट पर्यंत आपण अल्टिमेटम दिलेला आहे तोपर्यंत जर मराठा आरक्षण जाहीर केलं आणि सग्या सोयऱ्यांचा प्रश्न निकाली काढला तर ठीक आहे नाहीतर येत्या 29 ऑगस्टला तुम्ही सर्व जण अंतरवाली सराटी मध्ये या आपण तेव्हाच ठरवू आपण लढायचं की यांना पाडायचं असे मत मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.

पश्चिम महाराष्ट्र मधील दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅलीची सुरुवात सोलापूर शहरांमधून करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य मेळाव्यामध्ये जरांगे पाटील हे बोलत होते. 

यावेळी त्यांचे स्वागत मराठा क्रांती मोर्चाचे अमोल शिंदे, रवी मोहिते यांनी केले. छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून जरांगे पाटील यांनी एक तासाच्या आपल्या घणाघाती भाषणांमध्ये त्यांनी समाजासह राजकारण्यांचा समाचार घेत पश्चिम महाराष्ट्राला कधीही कमी लेखू नका आणि त्यातल्या त्यात मराठ्यांच्या तर नादाला लागू नका असा घणाघात करत हे सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मनस्थितीत दिसत नाही आता विधानसभा निवडणुकीतच ताकद दाखविण्याची गरज आहे तरी मराठा समाजाने आता आपल्या हक्काची लढाई आणखी तीव्र केली पाहिजे, असे आवाहन मराठा आरक्षणाचे प्रणेते मनोज जरांगे – पाटील यांनी सोलापूरात केले.

 

    छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला धारेवर धरले .तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर , राज ठाकरे तसेच नारायण राणे आणि छगन भुजबळ यांच्यावरही जरांगे पाटील टीकास्त्र सोडले . हे राजकारणातील नेते मराठा समाजाचे विरोधक आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचा जो कोणी उमेदवार असेल त्यालाच मराठा समाजाने मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले. भाजपच्या लोकांनी एकाचे तीन क्रांती मोर्चे केले आहेत त्यामुळे त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये आता मराठा समाजाच्या समन्वयकांना सुद्धा फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. काहीजण सत्तेसाठी पावसात भिजतात ,आपण जातीसाठी पावसात भिजू , असे सांगत जरांगे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावरही टीका केली. 

मराठा समाज संयमी असल्यामुळेच आतापर्यंत मराठा आरक्षणाच्या आंदोलन टिकून राहिले आहे. मराठा समाजाने संयम बाळगावा आपल्याला शंभर टक्के आरक्षण मिळणार आहे त्यामुळे मुंबईला जाण्याची गरज पडणार नाही, असेही पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने उभारण्यात आलेल्या भव्य व्यासपीठावर मनोज जरांगे – पाटील यांचा क्रेनद्वारे भलामोठा पुष्पहार घालून यथोचित सन्मान करण्यात आला. एक मराठा लाख मराठा ,आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता मराठा बांधव रैलीमुळे सोलापूरात आज सर्वत्र भगवेमय वातावरण दिसून येत होते.

 

⏹️ सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांचे              जरांगे पाटलानी घेतले दर्शन.      

⏹️ नेता आणि पक्ष मोठा करू नका, स्वतःचा समाज            अन् त्यांच्या लेकरांना मोठं करा.

⏹️ ज्या राजकारण्यांना मोठं केलं तेच समाजाला अडचणीत आणत आहेत.             

⏹️ मला बदनाम करण्याचे फडणवीसाचं षडयंत्र. 

⏹️ मी मरणाला घाबरत नाही. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *