शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही
मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून शिंदे – फडणवीस – पवार यांच्या राज्यात शेतकरी देशोधडीला लागला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तर कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून अवयव विकायची तयारी दाखवली असून कर्जफेडीसाठी अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी हे शाहू, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील दुर्दैव आहे तरीही महाराष्ट्रातील सरकार याकडे दुर्लक्ष करत आहेत असा घणाघाती प्रहार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्रा.काकासाहेब कुलकर्णी यांनी केला आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्रा काकासाहेब कुलकर्णी यांनी सरकारवर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, राज्यात दुष्काळ पडला आहे सरकारला मात्र शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. स्वतःचे मार्केटिंग करून घेण्यात राज्यातील मंत्री व्यस्त आहेत मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे ते साफ दुर्लक्ष करत आहेत राज्यातील शेतकऱ्यांचा प्रश्नही या सरकारला जाब विचारुन शेतकऱ्यांना भरघोस मदत करायला भाग पाडणार असल्याचे प्रा.काकासाहेब कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.