शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थिनींनी आयोजिला कृतज्ञता सोहळा
एल.बी.पी.एम. महाविद्यालयातील नाविन्यपूर्ण उपक्रम
सोलापूर : बदलत्या काळानुरूप मानवाच्या जीवन मूल्यात बदल घडून येत असताना शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यात अंतर पडता कामा नये अशी काळजी व्यक्त करताना शिक्षकांनीही नैतिक मूल्य, सामाजिक संवेदनशीलता आणि संशोधकवृत्ती जोपासावी असे आवाहन प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांनी केले. सोलापूरातील सातरस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त महाविद्यालयातील सर्व विद्याशाखांतील विद्यार्थिनींनी आपले आयुष्य घडविणाऱ्या शिक्षकाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे बोलत होते प्रारंभी भारतरत्न माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन विद्यार्थिनींनी सत्कार केला.
या सोहळ्यात कांचन कुलकर्णी, प्रेरणा जंगम, प्रियंका माने, गायत्री दीक्षित, रीमा माने, मानसी कोळी, सानिया ढालायात, विद्या पाटोळे, शालिनी मनसाबळे आदी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करताना निरनिराळ्या कविता, चारोळ्या, सुभाषिते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
पुढे बोलताना प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे म्हणाले की, शिक्षक हा समाजाच्या पाठीचा कणा असतो. बालपणापासून विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यावर योग्य वळण आणि आकार देऊन एक आदर्श नागरिक निर्माण करण्याची जबाबदारी पार पाडत असतो. हा कृतज्ञता सोहळा आयोजित करून विद्यार्थिनींनी शिक्षकांच्या जबाबदारीत वाढ केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली यावेळी प्रा. युवराज जाधव, डॉ. प्रदीप जगताप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राशद शेख या विद्यार्थिनीने केले सूत्रसंचालन स्मिता गायकवाड तर आभार प्रदर्शन अर्चना गुडशेल्लू यांनी केले यावेळी उपप्राचार्य प्रा देवराव मुंडे , स्मिता गायकवाड, अर्चना गुडशेल्लूसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थिंनी उपस्थित होते